ऑपरेशन सिंदूरला यश, देशभरातील नेत्यांकडून भारतीय सैन्याचे कौतुक   

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला. या प्रत्युत्तराचे जगभरात कौतुक केले जात आहे. भारताच्या हवाई दलाची आणि लष्कर विभागाची कामगिरी अतिशय मोलाची आहे. मोठमोठ्या नेत्यांनी समाजमाध्यमांद्वारे या घटनेवर त्यांची मते व्यक्त केली आहेत. 
 
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानशी संबंध असलेल्या दहशतवाद्यांनी २५ पर्यटक आणि एका काश्मिरी पोनी राईड ऑपरेटरच्या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी रात्री 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. या कारवाईत सीमा आणि नियंत्रण रेषेपलीकडे नऊ दहशतवादी तळांवर अचूक हल्ले करण्यात आले. लष्कर-ए-तैयबा, हिजबुल मुहाजिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी गटांनी या ठिकाणांचा वापर केला होता. भारताने वारंवार पाकिस्तानवर दहशतवादाला आश्रय दिल्याचा आरोप केला आहे आणि जागतिक दहशतवादाविरुद्ध संयुक्त लढा उभारण्याचे आवाहन जगाला केले आहे.
 
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा जगाला संदेश 
 
सोशल मीडियावर बोलताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, "जगाने दहशतवादाला शून्य सहनशीलता दाखवावी."
 
ऑपरेशन सिंदूरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया 
 
“भारतीय सैन्य दलाचे हार्दिक अभिनंदन! पाकिस्तान येथील दहशतवाद्यांचे ९ अड्डे अचूकपणे एयर स्ट्राइक करून पूर्णतः उद्ध्वस्त केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि सर्व देशवासीयांचे मन:पूर्वक अभिनंदन! 
 
माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी केले लष्कराचे कौतुक
 
, “प्रत्येक भारतीयाचा सैन्यावर पूर्ण विश्वास आहे, जे छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करतात. आज, त्याच विश्वासाचे दर्शन घडवत, भारतीय हवाई दलाने पहाटे १:३० वाजता नऊ दहशतवादी ठिकाणांवर यशस्वी हवाई हल्ले करून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत, कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला किंवा पाकिस्तानी लष्करी स्थळांना हाणी न होऊ देता नऊ दहशतवादी ठिकाणांना अचूक आणि नियोजनबद्ध पद्धतीने लक्ष्य करण्यात आले.
 
'मला वाटते की हा फक्त एक ट्रेलर आहे' : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
 
“आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या भारतीय सशस्त्र दलांनी हवाई हल्ल्याद्वारे पाकिस्तानला जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिले आहे. मला वाटते की हा फक्त एक ट्रेलर आहे, पाकिस्तान आता पुढे काय होते ते पाहेल. आपला देश पाकिस्तानमधील दहशतवादाची मुळे पूर्णपणे उखडून टाकेल.  
 
सैन्यदलांची ताकद, राजकीय इच्छाशक्ती आणि देशवासीयांची एकता म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’: उपमुखमंत्री अजित पवार
 
“भारतानं दहशतवादाविरुद्ध कणखर भूमिका घेत पहलगाममधील हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून आज पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून ते नष्ट केल्याबद्दल मी भारतीय वायुसेना, नौसेना, थलसेनेच्या नेतृत्वाचं आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो. भारतीय सैनिकांच्या क्षमतेवर देशाला पूर्ण विश्वास असून संपूर्ण देश एकजुटीनं त्यांच्यामागे उभा आहे.
 
आदित्य ठाकरे यांच्याकडून भारतीय सैन्याचे कौतुक 
 
आज रात्री पोओजेके मध्ये केलेले अचूक हल्ले दहशतवादाविरुद्ध आहेत आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या ठिकाणांवर अचूक हल्ला केल्याबद्दल भारतीय संरक्षण दलांचे कौतुक. त्यांच्यावर एवढा जोरदार हल्ला करा की त्यांना पुन्हा कधीही दहशतवाद करता येणार नाही. जय हिंद
 
हीच भारताची खरी ओळख : रोहित पवार
 
राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी लष्करातील स्त्रीशक्तीचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हंटले आहे की, “संपूर्ण जगाला ऑपरेशन सिंदूरची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांनी दिली. हा क्षण खूप बोलका असून भारतीय स्त्रीशक्तीची ताकद, भारताची खरी ओळख दाखवून देणारा आहे. तिन्ही संरक्षण दलांत महिलांना सक्षम संधी देणारा १९९१ मध्ये घेतला गेलेला ऐतिहासिक निर्णय खऱ्या अर्थाने दूरदृष्टीचा म्हणावा लागेल!”
 
दहशतवादाविरुद्ध ऑपरेशन सिंदुर हे नावच पुरेसे : सुप्रिया सुळे 
 
“मला भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे, त्यांनी महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. ही लढाई कोणत्याही देशाविरुद्ध किंवा कोणत्याही नागरिकांविरुद्ध नाही, तर ती दहशतवादाविरुद्ध आहे.अशी प्रतिक्रिया पत्रकार परिषदेत बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. 

Related Articles